
मुंबई : दहिसर येथे बसची धडक लागून एका ४७ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. चेतना हरेशभाई दर्जी असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या अपघाती मृत्यूप्रकरणी बसचालक प्रसाद अरुण मेस्त्री याला दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने जामीनावर सोडून दिले. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दहिसर येथील सर्व्हिस रोड, गोकुळ आनंद हॉटेलसमोरुन डावीकडे वळण घेताना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दहिसर येथे कामासाठी गेलेल्या चेतना यांना गोकुळ आनंद हॉटेलसमोरून जात असताना एका बेस्ट बसने धडक दिली. बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक प्रसाद मेस्त्रीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.