पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी यार्ड उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याठिकाणी मालगाड्यांनाही थांबा मिळणार आहे. यामुळे लवकरच काही वर्षांमध्ये जोगेश्वरी हे रेल्वेगाड्यांचे प्रमुख केंद्र बनणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार लक्षात घेऊन आणखी एक छोटेखानी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून मेल, एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येतात. पनवेल टर्मिनसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल, एक्स्प्रेस सुटतात. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्यांची संख्या लक्षात घेता ही टर्मिनस अपुरी पडत असून मुंबई उपनगरात आणखी एक छोटे टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार जोगेश्वरीत टर्मिनस उभारण्याच्या प्रस्तावाला २०१९ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने २०२२ मध्ये मंजुरी दिली.