

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल स्वरूपात संकलन, संचयन, हस्तांतरण आणि पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एबीसी आयडी/अपार आयडी अनिवार्य केले आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वैध एबीसी आयडी/अपार आयडी नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यानी परीक्षा अर्जात नमूद केलेला आयडी त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर दर्शविण्यात येणार आहे. असे असूनही अद्याप ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप आपला एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालये व संस्थांना देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे वैध एबीसी आयडी/अपार आयडी उपलब्ध नाही किंवा ज्यांनी तो विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र विद्यापीठामार्फत निर्गमित केले जाणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने यापूर्वी विविध परिपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना एबीसी आयडी/अपार आयडी तयार करून विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अनुषंगाने विशेष शिबिराचे आयोजनही विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.