

भाईंंदर: मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यावर सोशल मीडियासाठी रिल्सच्या नावाखाली सुरू असलेल्या अशोभनीय प्रकारांमुळे किल्ल्याचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व धोक्यात आल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
देशमुख यांनी सांगितले की, गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असून येथे अश्लील चित्रीकरण, मद्यपान, अशोभनीय वर्तन आणि शिस्तभंगाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे किल्ला परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था, नियमित पोलीस गस्त आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अल्पवयीनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांना समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात देण्याची भूमिका त्यांनी मांडली. घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. घोडबंदर किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे पावित्र्य आणि सन्मान जपण्यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.