आदित्य ठाकरे -आशीष शेलारांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी!

आदित्य ठाकरे -आशीष शेलारांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी!

कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून भाजप नेते आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.
Published on

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गटानेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच आता कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून भाजप नेते आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि पेग्विनच्या मुद्यावरून पलटवार करताना थेट पंतप्रधान मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्याचा हिशेब द्यावा, असा टोला लगावला. त्यावर भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करीत कंत्राटदारांकडून किती कमिशन घेतले, असा सवाल केला.

या अगोदर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करतानाच आम्ही मुंबईत पेंग्विन आणल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला ५० कोटी मिळाले. यातून प्राणीसंग्रहालयाचे उत्पन्न वाढले. मात्र, देशात आणलेल्या चित्यांचे काय झाले, असा सवाल उपस्थित करीत भाजप नेत्यांना चांगलाच टोला लगावला. त्यांच्या या टीकेला अ‍ॅड. शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

कंत्राटदारांकडून किती कमिशन घेतले? -आशीष शेलार

तुम्ही पेग्विन आणताना, त्यांचे घर बांधताना, देखभाल करताना कंत्राटदारांकडून किती कमिशन घेतले, याचा हिशेब द्यावा. या अगोदर तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांनी तुमचा हिशेब केला आहे. आता उरलासुरलाही हिशेब मुंबईकर निवडणुकीत करतीलच, असा टोलाही शेलार यांनी लगावला. मुंबईत नालेसफाई, रस्ते, डांबरीकरण, बेस्ट बस, पालिका शाळेतील वह्या, कपडे, कोविडमधील बॉडी बॅग अशा कंत्राटातील कटकमिशनचा हिशेब कंत्राटदारांकडून घेण्याची सवय यांना वर्षानुवर्षे लागली आहे. तेच आता भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत, असेही शेलार म्हणाले.

==========

logo
marathi.freepressjournal.in