
मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनअंतर्गत ‘मुंबई हरित योद्धा’ हा उपक्रम राबवला जात आहे. मुंबईत ग्रीन स्पेस निर्माण करताना येथील तापमान, पूरस्थिती आटोक्यात आणून ‘इझ ऑफ लिव्हिंग’साठी सरकार प्रयत्न करत आहे . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मुंबई हरित योद्धा’ या कार्यक्रमात मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ‘जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्गावर वृक्षारोपण करून ‘मुंबई हरित योद्धा’ उपक्रमाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
मुंबईला मोकळा श्वास देण्यासाठी हरित मुंबईचा संकल्प सरकारने केला. त्याअंतर्गत मुंबईत सध्या असलेल्या झाडांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याचा निर्धार आहे. २०२०मध्ये पालिकेच्या एकट्या के पश्चिम विभागात ६५ हजार झाडं लावली असून, येत्या काळात या ठिकाणी आणखी अडीच हजार झाडं लावण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचबरोबर शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच नवी रोपटीदेखील लावली जाणार आहेत. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, या रस्त्यालगत किती कार्बन उत्सर्जित होईल त्याची पाहणी करून तेवढी झाडे लावली जाणार असून मुंबईतल्या प्रमुख पाच रस्त्यालगत झाडं लावण्याचा सरकारचा निर्धार आहे.