राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,' अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गृहखात्याच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गृहखात्याची बैठक बोलावली होती यावेळी गृहखात्याशी संबंधित विविध विषयावर चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना फडणवीस म्हणाले, 'तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. तुरुंग विभागात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.आपल्या तुरुंगांमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे, मात्र पैसे किंवा कोणी व्यक्ती नसल्यामुळे ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाहीत. अशा कैद्यांना तुरुंगाबाहेर जाता यावं, यासाठी आम्ही सामाजिक संघटनांची मदत घेणार आहोत.
सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे लवकरात लवकर उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,' असंही फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले.