प्रतिनिधी/मुंबई : जनता अदालत घेतल्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागत आहे. लगेच सूरज चव्हाण यांना अटक झाली. राजन साळवींना त्रास दिला जातोय. राजन साळवी यांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी काही चूक केली नाही आणि केली असती तर तुमच्यासोबत ते आले असते, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. रेसकोर्स आणि थीम पार्कवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्याच्या वतीने दावोसला जाण्याची खासदारांना परवानगी असते का, असा सवालही त्यांनी केला आहे.
रेस कोर्ससंदर्भात आदित्य ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना 'रेसकोर्समध्ये ओपन हाऊस घेतलं. पण त्यात प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. थीम पार्क आमचा देखील मुद्दा होता पण कोणतही कन्स्ट्रक्शन न करता, पण आता हा प्रकल्प राबवून मुंबईकरांचे पैसे तबेल्यांवर वापरणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला केला. तसंच एफएसआय बाजूच्या गृहनिर्माण प्रकल्पाला देण्याची गरज काय आहे? आमची वर बांधकाम न करण्याची मागणी मान्य झाली. पण अंडरग्राऊंड पार्किंग देखील आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दावोस दौऱ्यासंदर्भात बोलताना 'परदेश दौऱ्यावर खूप खर्च झाला आहे. गेल्या वर्षी ४० खोक्यांचा खर्च झाला होता. मात्र, गेल्यावर्षीच्या अनेक प्रकल्पांचं पुढे अद्याप काही झालं नाही, अशी माझी माहिती आहे. काही झालंच असेल तर उद्योग मंत्र्यांनी पुढे येऊन पुरावे द्यावे. तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री दीड दिवस डावोसला गेले होते. ४० लोक घेऊन गेले होते. पण, तेव्हा एमआयडीसीला २० कोटी खर्च दाखवण्याचं बंधन होतं. पण तिथे काय केलं? तर ज्या उद्योगपतींना इथे भेटणे अपेक्षित होते ते त्यांना तिथे भेटले त्यामुळे काम शून्य झालं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मला तीन वेळा बोलायला मिळाले होते. या तिथे या मुख्यमंत्र्यांचा एक फोटो नाही. कदाचित ते भाजपच्या परवानगीच्या प्रतीक्षेत होते आणि आता ते एमओयू झाले आहेत त्यांच्यासोबत आमची पण चर्चा झाली होती, पण यांनी हे एमओयू थांबवून ठेवले होते. असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले.