मुंबईतील हवेचा दर्जा खालावला; मान्सूनने दडी मारल्याचा परिणाम

वातावरणाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आनंद घेत आहेत.
 मुंबईतील हवेचा दर्जा खालावला; मान्सूनने दडी मारल्याचा परिणाम

शुद्ध हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे, ही काळाची गरज बनली असताना गेल्या तीन महिन्यांनंतर मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला आहे. पावसाळ्यात मुंबईतील हवा स्वच्छ आणि विनाप्रदूषित असते; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच वाऱ्याचा वेग मंदावल्याने मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे.

‘सफर’ या हवेचा दर्जा आणि वातावरणाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आनंद घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. “पावसासोबत हवेतील दूषित घटक निघून जात असल्याने तसेच पावसाळ्यात हवेचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना चांगल्या दर्जाची शुद्ध हवा मिळते.

सध्या वाऱ्याचा वेग तसेच पर्जन्यमान कमी झाल्यामुळे हवेचा दर्जा किंचितसा घसरला आहे. मान्सूनने पुन्हा जोर पकडल्यास, मुंबईकरांना परत शुद्ध हवा घेता येईल,” असे सफरचे प्रकल्प संचालक गुफ्रान बेग यांनी सांगितले.

दिल्ली, पुण्यातही अशुद्ध हवा

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने दडी मारल्यामुळे हवेच्या दर्जामध्ये घसरण नोंदवली गेली आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद येथील हवेचा दर्जाही चांगल्या वरून समाधानकारक अशा स्तरापर्यंत येऊन पोहोचला आहे. दिल्लीतील हवेचा दर्जा खराब झाला असला तरी पुणे आणि अहमदाबाद येथील हवेची स्थिती समाधानकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in