

धैर्य गजरा / मुंबई
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 'इंडिगो'चा गोंधळ झाल्यानंतर भारतीय विमान प्रवासी अतिसावध झाले आहेत. प्रवाशांनी आता प्रवास संरक्षण विमा उतरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवासी विमा संरक्षणाच्या मागणीत १०० टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे.
इंडिगोला डिसेंबर २०२५ मध्ये प्रणालीगत अपयशाचा सामना करावा लागला. डीजीसीएने सुधारित केलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (एफडीटीएल) नियमांकडे संक्रमण करताना योग्य नियोजन न झाल्याने हे संकट ओढवले. वैमानिकांचा थकवा टाळण्यासाठी नव्या नियमांनुसार अनिवार्य विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला होता; मात्र हिवाळ्यातील लग्नसराई आणि सुट्यांच्या गर्दीच्या काळात इंडिगोकडे असलेले मर्यादित क्रू हा बदल पेलू शकले नाहीत.
या विलंबाचा फटका १६ लाख प्रवाशांना बसला. डिसेंबरमध्ये सुमारे ५,६८९ उड्डाणे रद्द झाल्याचे कंपनीने जाहीर केले. ज्यामुळे त्या महिन्यात इंडिगोचा बाजारहिस्सा घसरून ५९.६ टक्क्यांवर आला.
गुरुग्रामस्थित ट्रॅव्हल असिस्टन्स आणि इन्श्युरन्स कंपनी 'अॅनक्रॉस असिस्ट' नुसार, गेल्या दोन महिन्यांत प्रवासी विम्याचा ऑफटेक २.५ वरून ६ टक्क्यांपर्यंत वाढला असून, ही वाढ १४० टक्के आहे.
'विमान वाहतुकीतील गोंधळामुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे. तसेच विमा उत्पादने आता बुकिंग प्रक्रियेत सहजपणे समाविष्ट केली जात असल्याने प्रवाशांना ती निवडणे सोपे झाले आहे. प्रवास नियोजनात विमा हा 'असले तर चांगले' या श्रेणीतून 'अत्यावश्यक' या श्रेणीकडे सरकत असल्याचा बदलही आम्हाला जाणवतो, असे अॅयक्रॉस असिस्टचे सीईओ नीरज वर्मा यांनी सांगितले.
'क्लिअरट्रिप' नेही त्यांच्या प्रवासी विमा उत्पादनांची निवड करणाऱ्या प्रवाशांमध्ये १०० टक्के वाढ झाल्याचा दावा केला आहे. अलीकडील विमानवाहतूक व्यत्ययानंतर, हवाई प्रवास बुक करताना क्लिअरट्रिप फ्लेक्स, क्लिअरट्रिप फ्लेक्समॅक्स आणि तृतीय पक्ष विमा यांसारखी इन्श्युरन्स उत्पादने निवडणाऱ्या प्रवाशांमध्ये वर्षभरात १०० टक्के वाढ आम्ही नोंदवली आहे. ही वाढ ग्राहकांच्या वर्तनातील स्पष्ट बदल दर्शवते, ज्यात अधिकाधिक प्रवासी शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडचणींपासून आपल्या प्रवासाचे संरक्षण करण्याचा सक्रिय निर्णय घेत आहेत, असे क्लिअरट्रिपच्या चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर मंजरी सिंगल यांनी सांगितले.
कारणे काय ?
अभूतपूर्व संकटातून 'प्रवासी विमा' हे नवे 'आवश्यक' साधन म्हणून पुढे आले. ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी आणि विमा कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय प्रवासी आता केवळ साध्या तिकिटांवर नशीब आजमावण्यास तयार नाहीत. त्या आता प्रवासी विम्याची निवड करत आहेत. उड्डाणे रद्द होणे, सामान उशिरा मिळणे आणि दीर्घकाळ चालणारे व्यत्यय या अनुभवांमुळे प्रवासी आपल्या प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग झाले आहेत, असे मानतात.
शून्य रद्द तिकीट विमा, सामान हरवण्याचे संरक्षण, प्रवासात व्यत्यय आल्यास मदत आणि पर्यायी व्यवस्था आदी प्रवासी विमा उत्पादने आता तिकीट बुकिंगच्या टप्प्यावरच गांभीर्याने विचारात घेतली जात आहेत. उद्योगातील सूत्रांनुसार, डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत, पूर्वी अनावश्यक लक्झरी मानली जाणारी ही उत्पादने मागणीच्या बाबतीत दुप्पट झाली आहेत.