

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वीच्या काही तासांत घडलेल्या आणि मृत्यूनंतर समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे काही प्रश्न उपस्थित करत याचिका दाखल करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर आरटीआयद्वारे डीजीसीए, सीएमओ यांना अनेक ई-मेल पाठवून काही गोष्टींची विचारणा करण्यात आली. मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे याचिकेत नमूद करताना राज्य सरकार, सीएमओ, डीजीसीए, सीआयडीसह रोहित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
याचिकेत उपस्थित केलेले प्रश्न
अपघातानंतर व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे भारतात आहेत का ते परदेशात पसार झाले.
अपघात झालेले व्हीएसआरचे ते वादग्रस्त विमान उडण्यालायक राहिले होते का? विमान उतरवण्यात अडचणी येत होत्या, तेव्हा वैमानिकाने एटीसीसोबत संपर्क साधला होता का? त्यांना काय पर्याय सुचवण्यात आले? अजित पवार यांचा बारामती दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम का बदलण्यात आला? या सर्व बाबींबाबत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
याचिकेतील मुख्य मागण्या
या प्रकरणी राज्य सीआयडीकडून एक एसआयटी स्थापन करून तातडीने चौकशी व्हायला हवी.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करून त्यांच्या देखरेखीखाली हा तपास कारण्यात यावा.
डीजीसीए आणि रोहित पवार यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सारी माहिती चौकशी आयोगापुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत.