
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आता पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्ह्यांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे. खुद्द अजितदादा पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या बालेकिल्ल्याची जबाबदारी असणार आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिक आणि मुंबई सांभाळणार आहेत.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आगामी वर्ष हे निवडणुकांचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा फायदा पक्ष संघटनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश कार्यकर्ते आपल्याकडे वळविणे आणि नवीन कार्यकर्ते तयार करण्याचे आव्हान अजितदादांसमोर असणार आहे. त्यादृष्टीनेच ही तयारी सुरू झाली आहे.