

मुंबई : बार कौन्सिल ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणारी अखिल भारतीय बार परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने काही विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
विधी पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थांना वकिली व्यवसाय करण्यासाठी अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे पदवी प्राप्त या परीक्षेच्या तयारीला लागतात. तसेच अनेक विद्यार्थी वकिली व्यवसायाबरोबरच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. मात्र अखिल भारतीय बार परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाची एलएलएम सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
मुंबई विद्यापीठाने एलएलएम अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा ७ जून रोजी घेण्याची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.