मुंबईत ‘शहरी जंगल’ उभारणीचा प्रयोग केला जाणार

या जंगल उभारणीसाठी मुंबई मनपाच्या नियोजन विभागाने निविदा मागवल्या आहेत
मुंबईत ‘शहरी जंगल’ उभारणीचा प्रयोग केला जाणार
Published on

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. विशेषत: शहरात पर्यावरणाचा विकासासाठी बळी दिला जात आहे. पर्यावरण नष्ट झाल्याचे परिणाम आता दिसत चालले आहेत. त्यामुळे मुंबईत ‘शहरी जंगल’ उभारणीचा प्रयोग केला जाणार आहे. मरोळजवळ मिठी नदीच्या किनारी हे जंगल उभारले जाणार आहे.

या जंगल उभारणीसाठी मुंबई मनपाच्या नियोजन विभागाने निविदा मागवल्या आहेत. मरोळ औद्योगिक परिसरात सर्वात कमी झाडे आहेत. त्यामुळे या भागात प्रदूषणाचे प्रमाण व तापमानही अधिक आहे. त्यामुळे या भागात ३.२ एकर जागेत १३९ जातींची झाडे लावण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी ६.९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विशेष निधीची व्यवस्था केली. यातून शहरी जंगल उभारणी केली जाणार आहे. यानंतर मुंबई महापालिकेने २६ जानेवारी २०२० मध्ये वडाळा येथील भक्ती पार्क येथे शहरी जंगल उभारले. मियावाकी संकल्पनेतून ५७ हजार झाडे लावण्यात आली. दोन वर्षांपूर्वी लावलेल्या प्रकल्पाला आता चांगली फळे लागली आहेत. येथे हरित वन तयार झाले आहे. मुंबई मनपाने शहरातील ६४ ठिकाणी ४ लाख झाडे लावण्याचे ठरवले आहे.बांबू, पाम, शोभिवंत वनस्पती, गवत आदींचा त्यात समावेश आहे.मुंबई महापालिकेचे उद्यान विभाग शहरी जंगलासाठी नवनवीन भूखंड शोधत आहे. स्थायी विकास व पर्यावरण रक्षण व्हावे, असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मरोळला शहरी जंगल उभारल्याने पर्यावरणाचे हितरक्षण होईल. त्यामुळे उपनगरातील तापमान कमी होण्यास मदत मिळेल. सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे काँक्रीटचे प्रमाण वाढत आहे. झाडे कमी होत आहेत. मरोळला मिठी नदीच्या किनाऱ्यावर झाडे लावल्याने भरपूर पाऊस पडल्याने नदीचा पूर रोखता येऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in