
मुंबई : अनंतचतुर्थी दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात ७० नैसर्गिक स्थळांसह २९० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन व्यवस्थेसाठी १० हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी २४५ नियंत्रण कक्षदेखील कार्यरत असतील.
आरोग्य आणि इतर आपत्कालीन व्यवस्था
विसर्जन स्थळांवर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २३६ प्रथमोपचार केंद्रे आणि ११५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी ६.१८८ फ्लडलाईट आणि शोधकार्यासाठी १३८ सर्चलाईट लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी १९७ तात्पुरती शौचालये देखील उभारण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने आणि प्रशिक्षित मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे.