
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु होते. त्यांच्या मागण्या अखेर राज्यसरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मानधनात १५०० रुपायांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एवढंच नव्हे तर, अंगणवाडी सेविकांना मोबाईलदेखील दिला जाणार आहे. तसेच, त्यांना पेन्शन योजनेचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरामध्ये सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होता. याची दखल घेत राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
बेमुदत संप पुकारल्यानंतर अंगणवाडी सेवाकांसोबत राज्य सरकारची चर्चा झाली होती. यावेळी राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांनी वाढ करण्यात येणार, तर त्यांना नवीन मोबाईल दिला जाणार. त्यांच्यासाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. बेमुदत संपामुळे याचा फटका लाखो बालकांना बसला होता. गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी बंद असल्याने अनके बालके पोषण आहारापासून वंचित राहिली होती. पण राज्य सरकारच्या या निर्णयानंतर पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.