वायव्य मुंबईतील निकालाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार; आदित्य ठाकरे यांची निवडणूक आयोगावर टीका

वायव्य मुंबईतील (उत्तर-पश्चिम) अमोल कीर्तीकर यांची जागा आम्हीच जिंकलेली आहे. मात्र, निवडणूक आयोग म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन’ झालेले आहे.
वायव्य मुंबईतील निकालाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार; आदित्य ठाकरे यांची निवडणूक आयोगावर टीका
Published on

प्रतिनिधी/मुंबई

वायव्य मुंबईतील (उत्तर-पश्चिम) अमोल कीर्तीकर यांची जागा आम्हीच जिंकलेली आहे. मात्र, निवडणूक आयोग म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन’ झालेले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा या निकालाविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असती, तर भाजपच्या २४० काय ४० जागाही आल्या नसत्या, असा दावाही त्यांनी केला.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा जागेच्या निकालावरून आता शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, अनिल देसाई, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि उत्तर-पश्चिमचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर उपस्थित होते.

अनिल परब यांनी यावेळी तांत्रिक मुद्दे स्पष्ट करताना सांगितले की, ४ जूनला निकाल लागला, त्यात अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. मात्र, हा निकाल संशयास्पद आहे. १९ व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली याची आकडेवारी दिली जाते. १९ व्या फेरीपर्यंत हे सगळे व्यवस्थित सुरू होते.

प्रत्येक फेरीनंतर पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारी टॅली करत असतात, तर ‘आरओ’ नंतर आकडेवारी फायनल करतात, पण इथे ‘आरओ’ आणि उमेदवाराचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर ठेवण्यात आले होते, त्यांना दूर बसवण्यात आले होते. मत मोजून झाल्यानंतर ‘फॉर्म १७ सी’ भरून द्यायचा असतो. ज्यामध्ये आपल्याला उमेदवाराला किती मते मिळाली हे द्यावे लागते. पण हे फॉर्म अनेकांना दिले गेले नाहीत.

मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब

निवडणूक केंद्रात मोबाईल वापरला गेला. त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. आता १० दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला. या १० दिवसांत मोबाईल बदलला गेला, असा आमचा आरोप आहे. हा गुरव कोण आहे? या अधिकाऱ्याचा मोबाईल वापरला का? या सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. हा विजय आमचा आहे, असेही परब म्हणाले. आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.

आमच्या टॅलीप्रमाणे ६५० मतांचा फरक

आमच्या टॅलीमध्ये ६५० पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. ६५० मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅलीमध्ये येतोय. निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही निकाल जाहीर करतोय. मात्र, येथे निकाल जाहीर करण्याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले तर दोन दिवसांत देऊ, असे सांगण्यात आले. नंतर हे फुटेज देण्यास नकार देण्यात आला. कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही, असे ते सांगतात.

logo
marathi.freepressjournal.in