“दहीहंडीच्या थरावरून कोसळून मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी (२३) या गोविंदाच्या घरच्यांना तत्काळ १० लाख रुपये मदत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे द्यावी आणि जखमींनाही मदत देणार आहात का? याबाबत सरकारने खुलासा करावा,” अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दहीहंडी उत्सवात मृत व जखमी झालेल्या गोविंदाना मदत करणार का? असा स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला होता; मात्र आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केलल्या या मुद्द्यावरून अजित पवार यांनी सरकारला विचारणा करत खुलासा करायला भाग पाडले. कोरोनाकाळात सण, उत्सव साजरे करता आले नव्हते; मात्र यावर्षी सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना दहीहंडीमध्ये अनेक तरुण रचलेल्या थरावरून कोसळून जखमी झाले आहेत, तर मुंबईत एका २३ वर्षांच्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या नातेवाईकांना तत्काळ १० लाख द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांत गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांनाही तत्काळ मदत द्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी सरकारकडे केली. दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेश दळवी याच्यावर उपचाराचा खर्च करण्यात आला आहे. आता त्याच्या घरच्यांना मदत देण्याचे व जखमींनाही मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.