

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत (एमएमआरडीए) राबविण्यात येत असलेल्या अटल सेतू ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जोडणी प्रकल्पाला वेग आला आहे. या मार्गातील विविध अभियांत्रिकी टप्पे पूर्ण झाली आहेत. त्यानुसार हा प्रकल्प फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे.
या प्रकल्पातील एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. १४१ ठिकाणी पिलर्स उभारण्यात आले आहेत, तर ८८ ठिकाणी पिलर कॅप्सची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ८३० पैकी ६५३ प्रीकास्ट गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या संरचनात्मक बांधणीला बळ मिळाले आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे एकाच जलद वाहतूक पट्ट्यात
या प्रकल्पाच्या पळस्पे परिसरात स्लिप रोड्स व सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असून द्रुतगती मार्गाशी वाहतूक जोडणी निश्चित होणार आहे. हा प्रकल्प ७.३५ किमी लांबीचा व सहा मार्गिकांचा पूल अटल सेतू आणि मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग यादरम्यानचा महत्त्वाचा दुवा म्हणून उभारण्यात येत आहे. चिर्ले आणि पळस्पेमार्गे थेट उच्च-गती जोडणी उपलब्ध होणार असून नवी मुंबई विमानतळालाही या मार्गातून सुलभ प्रवेश मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कॉरिडॉर मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांना एकाच जलद वाहतूक पट्ट्यात जोडणारा महत्त्वाचा कणा ठरणार आहे.
फेब्रुवारी २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार?
हा प्रकल्प फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. ‘मुंबई ३.०’अंतर्गत ही जोडणी नवी मुंबईसह आसपासच्या भागातील नव्या विकासकेंद्रांना चालना देणार आहे.