
मुंबई : एलएलबीच्या तीन आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. सीईटी सेल आणि राज्यातील सर्व शैक्षणिक मंडळांनी भविष्यातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी परस्परांमध्ये समन्वय साधावा, असे आदेश न्यायालयाने सर्व शैक्षणिक मंडळांना दिले आहेत.
एलएलबीसाठी २०१६ पासून सुरू केलेल्या सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि व्यवस्थापनाच्या अभावाकडे लक्ष वेधत विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शर्मिला घुगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली. तसेच सर्व शैक्षणिक मंडळांना विविध विद्यापीठ अनुदान आयोगांद्वारे तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.