आपले घर सुंदर असावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते; मात्र घरात सजावट करताना आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देतो. त्यामुळे घरातील अंतर्गत सजावट करताना अग्निजन्य वस्तूंचा वापर टाळणे गरजेचे असून या गंभीर गोष्टीकडे मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई महापालिका व अग्निशमन दलाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबईत लागणाऱ्या आगीच्या घटना या अधिकतर शार्ट सर्किटमुळे लागत असल्याचे तपासणीत दिसून आले आहे. आग लागण्याचा कॉल आल्यावर आगीवर नियंत्रण मिळवत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान २४ तास आपली सेवा बजावतात. तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. फायर ड्रीलचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते; परंतु आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतील पाहिजे.
आग लागूच नये ही प्रत्येकाचे मत आहे; परंतु आग लागल्यास आगीचा फैलाव झपाट्याने होऊ नये, यासाठी घरात अंतर्गत सजावट करताना अग्निजन्य पदार्थाचा वापर टाळावा, जेणेकरून मोठी दुर्घटना टाळणे शक्य होईल. त्यामुळे इंटिरिअर डेकोरशन करतेवेळी अग्निजन्य वस्तूंचा वापर टाळावा, असे आवाहन दैनिक नवशक्तिच्या माध्यमातून अश्विनी भिडे यांनी मुंबईकरांना केले आहे.