मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी (६६) यांची गोळ्या घालून हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून २६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. तर अनमोल बिश्नोई आणि इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
संशयित गुन्हेगारांचे सध्याच्या सत्ताधारी राज्य सरकारशी संबंध आहेत आणि म्हणूनच, चौकशी स्वतंत्र तपास संस्थेद्वारे करावी, अशी विनंती याचिकेत केली आहे. मुलगा झिशान सिद्दीकी, यानेही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या वडिलांसाठी अतिरिक्त व्हाय प्लस सुरक्षा मिळावी अशी मागणी केली होती. इतकेच नव्हे तर भाजपच्या मोहित कंबोज यांचे सहकारी अशोक मुंद्रा यांनी ऑगस्टमध्ये बाबा सिद्दीक यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली होती, याकडेही न्यायालायचे लक्ष वेधले आहे.
पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी!
पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा दाट संशय शेहझीन यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. सिद्दीकी यांचे झोपडपट्टीवासीयांशी चांगले संबंध होते आणि म्हणूनच परिसरातील अनेक विकासक आणि बांधकाम व्यावसायिक त्यांना अडथळा मानत होते. या दृष्टिकोनातून पोलिसांनी कधीही चौकशी केली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.