
शिंदे - फडणवीस सरकारमधील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. याचे कारण म्हणजे अपेक्षा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. आगामी ३० जानेवारीला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये त्यांनी पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रहार जनशक्ती पक्ष विरुद्ध भाजपा व शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "३० जानेवारीला होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये पाचही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे, अमरावतीतून किरण चौधरी, कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा, नागपुरातून अतुल रायकर तर नाशिकमधून अॅड. सुभाष झगडे असे पाच उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. यामधील एक-दोन जागा तरी आम्ही जिंकू" असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. ते पुढे म्हणाले की, "यासंदर्भातील कल्पना आम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली होती. या निवडणुकीसाठी आम्ही गेली ३ वर्षे मेहनत घेतली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विचारात घेऊन उमेदवार उभा करावा. अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र, त्यांच्याकडून काही उत्तर न आल्याने आम्ही पाचही ठिकाणी आपले उमेदवार उभे करत आहोत."