
पूनम पोळ / मुंबई
दहिसर येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान सहाव्या थरावरून कोसळून ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. १४ वर्षांहून लहान गोविंदाना हांडी फोडण्यास बंदी असतानाही गोविंदापथके याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे १४ वर्षांखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी करू नये तसेच न्यायालय आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे गोविंदापथक मंडळांनी पालन करावे, असे आवाहन प्रसिद्ध मंडळाकडून करण्यात येत आहे.
‘गोविंदा रे गोपाळा’... बोल बजरंग बली की जय...असा जल्लोष करत राज्यभरात गोविंदापथके दहीहंडी फोडण्यासाठी जातात. विशेषत: मुंबई आणि ठाणे या भागात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतो. या उत्साहादरम्यान,अवघ्या पाच वर्षाच्या मुलांसह वयस्कर गोविंदाचा सहभागही पाहायला मिळतो. यावेळी विविध ठिकाणी जाऊन दहीहंडी फोडणारे १०० हून अधिक गोविंदापथकांचे गोविंदा आणि त्यांचा उत्साह वाढवणारे सामान्य नागरिक असे उत्सवी वातावरण दिवसभर सर्वत्र पाहण्यास मिळते. या दरम्यान हांडी फोडताना काही घटनांमध्ये गोविंदा जखमी होतात. नुकतच दहिसर येथे महेश जाधव या ११ वर्षीय बालगोपालाचा दहीहंडी सरावादरम्यान गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
राज्यात दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसली, तरी १४ वर्षांखालील मुलांना थरांमध्ये सामील करण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मनाई केली आहे. तसेच, गोविंदांचा विमा काढणे, सुरक्षा नियम पाळण्याचेही निर्देश दिले आहेत.
मात्र, न्यायालयाच्या आदेशाला झुगारून काही मंडळं आणि आयोजक हे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे अपघातांचा सिलसीला सुरू राहतो. हे टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती प्रसिद्ध गोविंद पथक जय जवान मंडळाचे संदीप धावडे आणि विजय निकम यांनी दिली आहे.
अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना
-१४ वर्षाखालील मुलांना सगळ्यात वरच्या थरावर चढवू नये.
-प्रत्येक गोविंदाने हेल्मेट, सरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे.
-गोविंदा पथकात माणसांची जितकी क्षमता आहे तितकेच थर लावणे.
-किमान २ ते ३ महिन्यापूर्वी सरावाला सुरुवात केली पाहिजे.
-संपूर्ण संघाला जास्तीचे प्रशिक्षण दिले पाहिजे.
-किरकोळ दुखापत झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रथमोपचार किट सोबत असणे बंधनकारक.