
मुंबई : वांद्रे येथील भारत नगरमधील नमाज कमिटी मशिदीलगतच्या एका चाळीचा काही भाग शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रिहाना अन्सारी (६५) आणि मोहम्मद अन्सारी (६८) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वांद्रे परिसरातील भारत नगरमधील दोन मजली चाळ क्रमांक ३७ चा काही भाग शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास कोसळला. यावेळी दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला कोसळलेल्या चाळीच्या भागाच्या ढिगाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. या दुर्घटनेत एकूण १५ जण जखमी झाले असून यामध्ये ७ स्त्रियांचा आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांवर महापालिकेच्या केईएम रुग्णालयात तर उर्वरीत १३ जणांवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटना घडलेला परिसर चिंचोळा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडचणींचा सामना करावा लागला.