

मुंबई : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (एसजीएनपी) आकर्षण असलेल्या १८ वर्षीय 'बिजली' या वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे उद्यानातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास बिजलीने अखेरचा श्वास घेतला. २०१६ पासून या उद्यानातील प्राणी कुटुंबाची लाडकी सदस्य बनली होती.
गेल्या महिन्याभरात बिजलीच्या अन्नसेवनात घट झाली होती. त्यामुळे उद्यान प्रशासनाकडून तिच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवले जात होते. पश्चिम महाराष्ट्राच्या तांत्रिक पशुवैद्यकीय सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तिच्यावर सतत उपचार व देखभाल सुरू होती. बिजलीला पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. गेल्या दशकभरात वन्यजीव व्यवस्थापन, संवर्धन शिक्षण आणि प्राण्यांची काळजी घेण्याच्या मोहिमांमध्ये तिचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होण्यासाठी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. एसजीएनपी प्रशासनाने बिजलीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वन्यजीवप्रेमींना तिचे फोटो व आठवणी सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.