गेल्या १० वर्षांत तब्बल ११३ मराठी शाळा बंद पडल्या असून ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागली, ही बातमी दैनिक नवशक्तिने १५ जून रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर पालक वर्गात नाराजी पसरली असून भाजपनेही दैनिक नवशक्तिच्या बातमीनंतर प्रश्न लावून धरला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठी शाळांबाबत गंभीर दखल घेणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्यानंतर शिवसेनेची आक्रमता वेगळीच होती. बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे. स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत आहे. 'रोज मरे त्याला कोण रडे?' हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का?, असा सवाल साटम यांनी उपस्थित केला आहे.
मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “फाऊंडेशन डे” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही, असा टोलाही साटम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.