
मुंबई : कोराेना लॉकडाऊन दरम्यान दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार सुनील राणे आणि दहिसर येथील विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या आठ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे एफआयआर दाखल करण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने भाजप नेत्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले होते. त्या निर्बंधांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन भाजपच्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात दोन एफआयआर, सुनील राणे यांच्याविरुद्ध पाच आणि मनीषा चौधरी यांच्याविरुद्ध एक एफआयआर दाखल केला होता. संबंधित गुन्हे रद्दबातल ठरवण्याची मागणी करीत भाजप नेत्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.