
महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना विचारले असता त्यांनी, "सर्वांसाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत. कोणालाही भाजपत यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करतो." असे म्हणत थोरातांना खुली ऑफर दिली आहे. ते पुढे म्हणाले की, "स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपने मदत केली. त्यामुळे सत्यजीत तांबेंना आम्ही ऑफर दिली नाही. पण बाळासाहेब थोरातांना जर वाटले की भाजपत प्रवेश करायचा आहे तर त्यांचे स्वागतच आहे. आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत."
"आम्ही पक्ष वाढविण्याचे काम करतो. बाळासाहेब थोरात असतील किंवा दुसरे कोणीही असले, जर भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक असेल, तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. त्यांच्या रक्तातच काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केलेली आहेत. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते." असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच, "बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे," असा सल्लादेखील त्यांनी दिला.