मुंबई जिंकण्यासाठी भाजप दंगली घडवेल;  भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

मुंबई महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात आता राजकारण सुरू झाले आहे.
मुंबई जिंकण्यासाठी भाजप दंगली घडवेल;  भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप
Published on

“मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लीम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा,” असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा गुहागरमधील कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याला भाजप कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात आता राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा स्थितीत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी थेट भाजपला लक्ष्य केले आहे. “४० आमदार फोडूनदेखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता भाजप दोन समूहांत दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल. वाट्टेल ते झाले तरी मुस्लीम तरुणांनी डोकं शांत ठेवून भाजपचा डाव ओळखून मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसनेनेला सत्तेत आणावे,” असे आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लीम समुदायाला केले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही भास्कर जाधव यांनी यावेळी हल्लाबोल केला. 

भास्कर जाधव यांची नुकतीच शिवसेनेच्या नेते पदावर वर्णी लावली आहे. त्यामुळे ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. थेट भाजपला अंगावर घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. दंगलीसारखा भाजपवर गंभीर आरोप केल्यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. भाजप या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in