
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ५६ हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होणार आहे, अशी माहिती म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली.
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या दालनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयोजित सभा पार पडली. या बैठकीस प्रशासनाच्या वतीने उपायुक्त किशोर गांधी, किरण दिघावकर, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी शारदा गोसावी, प्रमुख लेखापाल, तर युनियनच्या वतीने खजिनदार महेंद्र पवार, मंदार गावकर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मलःनिसारण, मुख्य मलःनिसारण, गटारे, स्मशानभूमी आदी घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कामगारांना लाड- पागे समितीच्या शिफारशींन्वये वारसा हक्क नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. तर नवीन पेंशन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील २ वर्षांपासून रखडलेले देय दावे लवकर निकाली काढण्यासाठी (डी सी-१ दावे) सुधारित व सोपी नियमावली प्रसारित करण्याच्या सुचना डॉ. जोशी यांनी दिल्या.
३ लिपिकांची तत्काळ बदली
एकाच ठिकाणी राहुन, कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सफाई खात्याच्या पी.टी. केस खात्यातील ३ लिपिक व केईएम रुग्णालयात सुमारे २६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची तत्काळ बदली करण्याचे आदेश जोशी यांनी दिले. त्यामुळे बदली परिपत्रकाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती डॉ. बापेरकर यांनी दिली.