प्लास्टिक बंदीसाठी BMC आक्रमक; ५००० रुपयांचा दंड आकारणार

मुंबई पालिकेकडून आता प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
प्लास्टिक बंदीसाठी BMC आक्रमक; ५००० रुपयांचा दंड आकारणार
Published on

मुंबई : मुंबई पालिकेकडून आता प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या हातामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या म्हणजेच सिंगल युज प्लास्टिक पिशव्या दिसल्या तर ५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी पालिका, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्र येऊन कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता, घनकचरा, सिंगल युज प्लास्टिक, महानगरातील सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी मुद्द्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे व संबधित अधिकारी यांच्यात शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते बोलत होते. यापूर्वी मुंबई महापालिकेने कोरोना संसर्गकाळात प्लास्टिक बंदीवरील कारवाई थांबविली होती. पालिकेने आता ही कारवाई जोमाने सुरू करण्याचे ठरविले आहे. आता पालिका, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्र येऊन कारवाई करणार आहे. प्लास्टिक बंदीबाबत नव्याने जनजागृती करण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

अशी होते कारवाई

मुंबई महापालिका प्लास्टिक बंदी २०२२ च्या नियमानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६च्या कलम ९ अन्वये कारवाई होते. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रु., दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार, तिसऱ्या गुन्ह्यासाठी १५ हजार, चौथ्यांदा केलेल्या गुन्ह्यासाठी २० हजार, त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in