

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक नियंत्रण विभागांतर्गत मलेरिया नियंत्रण फवारणीसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. या कामगारांना इतर भत्तेही दिले जात नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनच्या सहाय्यक सरचिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि त्यावर लवकरच कार्यवाही होईल, असे उत्तर देत पालिका प्रशासनाने वेळ मारून नेण्याचा प्रकार केला आहे.
कीटकनाशक नियंत्रण विभागात सुमारे ११०० कंत्राटी कामगार काम करतात. महापालिकेच्या एच पूर्व आणि एच पश्चिम विभागातील ७५ कामगारांचा पगार पाच महिन्यांपासून थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य जबाबदारी याच कंत्राटी कामगारांवर देण्यात आलेली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास याच कामगारांना वेठीस धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते, असेही दळवी म्हणाल्या.
पालिकेच्या कोणत्याच सुविधांचा लाभ नाही
पालिकेमार्फत काम करताना दिला जाणारा गणवेश, घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी, तसेच कामगार विमा कार्डही दिले जात नाही. याबाबत कामगारांनी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. हे कामगार कायमस्वरूपी होऊ नयेत, यासाठी दरवर्षी सात महिन्यांचे आणि पाच महिन्यांचे कंत्राट केले जाते. तरीही कामगारांना त्यांची देय रक्कम दिली जात नाही, असेही एका कर्मचाऱ्याने सांगितले.
ए ते टी विभागपर्यंतच्या सर्वच कंत्राटी कामगारांच्या पगाराबाबत प्रस्ताव तयार आला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या विभागातील कामगारांचा पगार थकीत आहे याची माहिती नाही. प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकाली लागेल.
अमृत सूर्यवंशी, उप कीटकनाशक अधिकारी. मुंबई महापालिका