BMC Election : मुंबईचा चेहरामोहरा बदलू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, महायुतीने फोडला प्रचाराचा नारळ

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला. वरळीतील एनएससीआय डोममध्ये भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली.
BMC Election : मुंबईचा चेहरामोहरा बदलू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, महायुतीने फोडला प्रचाराचा नारळ
Photo : X (Eknath Shinde)
Published on

मुंबई : 'आम्ही फक्त बोलणारे नाही. काही लोक फक्त काम केल्याचे बोर्ड लावतात. परंतु आमच्या कामांचे स्मारक मुंबईत ठिकठिकाणी दिसत आहे. मुंबईकरांनो पालिका आमच्या हातात द्या. आम्ही पारदर्शी काम करून मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला. वरळीतील एनएससीआय डोममध्ये भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली.

त्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, परवा एमआयएमचे वारिस पठाण बोलून गेले की मुंबईमध्ये बुरखेवाली महापौर होणार आहे. मला वाटलं की, मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही की, भोंग्याचे सेल अचानक कसे डाऊन झाले. सकाळचा भोंगाही बोलेना, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच त्यांच्यातला कोणीही बोलायला तयार नाही. म्हणूनच आता छाती ठोकून सांगतो की, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच बनेल, असेही ते म्हणाले.

प्रत्येक कामात खोडा

मुंबईच्या निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीत काही अबोध बालक आहेत. हे बालक म्हणतात की, सगळं आम्हीच काम केलं. ते कोस्टल रोड, मेट्रोची निर्मिती आम्ही केली, असा दावा ते करतात. परंतु जनतेला सगळं माहिती असतं. कोस्टल रोड कोणी केला? बीडीडी चाळीचा विकास कोणी केला? मेट्रोचं काम कोणी केलं? असे मुंबईकरांना अर्ध्या रात्री जरी विचारलं तरी ते हे सगळं काम महायुतीने केलं, असंच सांगतील. प्रत्येक कामात खोडा कोणी घातला ? प्रत्येक कामाला स्थगिती कोणी केली दिली? हे विचारलं तरी मुंबईकर उद्धव ठाकरे यांचे नाव घेतील,' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले.

'तुम्ही फक्त मुंबईला लुटण्याचे काम केले. तुम्हाला तुमचे स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित करायचे आहे, तर आम्हाला सर्वसामान्य मुंबईकरांचे भवितव्य सुरक्षित करायचे आहे, हाच आपल्यातील मुख्य फरक आहे.' मराठी अस्मिता आणि मराठी बाणा विकल्याचा आरोप करत आम्ही जीव गेला तरी कोणासमोर लाचार होणार नाही,' असा टोला शिंदेंनी यांनी लगावला.

ही तर महायुतीच्या विजयाची नांदी - शिंदे

यावेळी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'ही केवळ प्रचाराची सुरुवात नाही, तर विजयाची नांदी आहे. मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.

logo
marathi.freepressjournal.in