BMC Election : भाजप, शिवसेनेने एकही जागा न दिल्याने रिपाइंचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत एकही जागा देऊ केलेली नाही. त्यामुळे मुंबईत ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. रिपाइंच्या या भूमिकेमुळे महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.
BMC Election : भाजप, शिवसेनेने एकही जागा न दिल्याने रिपाइंचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात
एएनआय
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत एकही जागा देऊ केलेली नाही. त्यामुळे मुंबईत ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. रिपाइंच्या या भूमिकेमुळे महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र उतरणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीतील घटक पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे, तर आता रिपब्लिकन पक्षानेही मुंबईत स्वबळाचा नारा देत ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने दुर्लक्ष केले. जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण देण्यात आले नाही. रिपब्लिकन पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करुन रिपब्लिकन पक्षाचा अवमान करण्याची भाजपची ही भूमिका निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे रिपब्लिकन पक्ष भाजप आणि एनडीएसोबत मजबुतीने उभा आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये रिपब्लिकन पक्षावर भाजपने जागावाटपात अन्याय केला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात तीव्र नाराजी आहे. महायुतीत सन्मानाने जागावाटप झाले नसल्यामुळे मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुक लढणार आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले.

रिपब्लिकन पक्षाने १० दिवसांपूर्वीच भाजपकडे आपल्याला हव्या असणाऱ्या २६ जागांची यादी दिली होती. त्यातील १५ ते १६ जागा जरी भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडल्या असत्या तरी महायुतीचा धर्म पाळल्याचे दिसले असते. मात्र, गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला आमंत्रण दिले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करुन ६ ते ७ जागा सोडत असल्याचे सांगितले. मात्र, त्या जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्याच नव्हत्या. ज्या जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्या नाहीत, त्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात अर्थ काय? आम्ही तर कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रस्तावही भाजपला दिला होता. तरीही भाजपने रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या जागा सोडल्या नाहीत, याकडे आपण मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in