BMC Election : मतदान करा, सवलत मिळवा! मतदान जनजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीसाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील संघटना इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनीही मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.
 प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीसाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील संघटना इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनीही मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या दिवशी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन/ निवडणूक) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या सूचनेनुसार महापालिकेमार्फत सर्वसमावेशक व बहुआयामी मतदार जागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यांचे आयोजन, मतदार जनजागृती फेरी, प्रभात फेरी, शाळा–महाविद्यालयांमधील उपक्रम, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र भरून घेणे, विविध सामाजिक व शैक्षणिक माध्यमांतून मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी सहभाग

आहार संघटनेने महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचा सार्वजनिक संपर्क लक्षात घेता, नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले.

आहार ही संस्था महाराष्ट्रातील ८,००० हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व करत असून, राज्यभरातील ६५ जिल्हा संघटनांशी संलग्न आहे.

मतदान हा लोकशाहीचा कणा असून, “मी समाजाचा एक जबाबदार घटक आहे” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण करून, मतदानाद्वारे कर्तव्ये पूर्ण करणे हा या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. मतदार सहभाग वाढविण्यासाठी प्रशासन, विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व व्यावसायिक संघटना एकत्रितपणे कार्यरत असल्याचे सकारात्मक चित्र या माध्यमातून समोर येत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत वाहनचालकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत असून, ‘फ्लॅशमॉब’ व इतर दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने मतदानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहे. डिजिटल युगाचा विचार करता, समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरही मतदार जनजागृती मोहीम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in