BMC Elections: मुंबईतील अपक्ष उमेदवारांपुढे प्रचाराचे आव्हान; प्रचारासाठी मिळणार केवळ १० दिवस; मोठ्या पक्षांचे उमेदवार लागले कामाला

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोचली आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचाराला लागणार आहेत. मात्र यामध्ये अपक्ष उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. अपक्ष उमेदवारांना ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने त्यांच्याकडे प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा अवधी मिळणार आहे.
BMC
BMC(Photo- https://www.mcgm.gov.in/)
Published on

मुंबई: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोचली आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचाराला लागणार आहेत. मात्र यामध्ये अपक्ष उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. अपक्ष उमेदवारांना ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने त्यांच्याकडे प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्याचे आव्हान असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्ष, निवडणूक आयोगाकडे नोंदणी आलेले पक्ष आणि अपक्ष उमेदवार तयारीला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षनेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांची आघाडी झाली असून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत निवडणूक अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ३१ डिसेंबर रोजी झाल्यानंतर उमेदवारांना २ जानेवारी रोजी निवडणूक अर्ज मागे घेता येणार आहे. ३ जानेवारी रोजी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे.

प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवार यादी जाहीर होताच उमेदवार प्रचाराला सुरुवात करतील. मात्र अपक्ष आणि लहान पक्षांची प्रचार करताना अडचण होणार आहे. ३ जानेवारी रोजी चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवार प्रचार साहित्य तयार करण्यास सुरुवात करतील. यामध्ये उमेदवारांचा एक दोन दिवसांचा अवधी खर्ची होतो. प्रचार साहित्य हाती मिळताच अपक्ष उमेदवार प्रचार सुरू करतील. मतदानापूर्वी एक दिवस अगोदर प्रचार थांबतो. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा अवधी मिळणार असल्याने अपक्ष उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १० दिवस मिळत असल्याने वॉर्डमधील घराघरात प्रचार करणे अशक्य आहे. त्यामुळे आयोगाने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अपक्षांचाही विचार करावा, असे जन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष साजिद शेख यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in