
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वायू प्रदूषणाची पातळी खालावली आहे. त्यामध्ये काही भागांचा विशेष समावेश आहे. या भागांवर पालिका करडी नजर ठेवणार आहेत.
मुंबईत २,२०० खासगी विकासक तथा संस्था यांची विकासकाम सुरू असून या व्यतिरिक्त शासकीय नागरी सुविधा कामे आणि पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती दिली.
मुंबई महानगर क्षेत्रातील वायू प्रदूषण या विषयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आदी उपस्थित होते.
मागील महिना नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान २८ मुद्यांची मार्गदर्शक सूचना, ‘ईएमपी’चे पालन होत आहे की नाही याची तपासणी केली जात आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना सुरुवातीला लेखी सूचना नंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. एवढे करूनही विकासक नियम पाळत नसेल तर विकासकला काम थांबवण्याची नोटीस बजावली जात आहे. आतापर्यंत २८६ ठिकाणांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच काम थांबवण्याची नोटीस दिल्यानंतर विकासकांनी काम सुरू ठेवल्यास संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले.