मुंबई : मुंबई महानगरपालिकेत अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत असली तरी भाजप कोणत्याही स्थितीत शिंदे गटाला महापौरपद देण्यास इच्छुक नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री अचानक दिल्ली गाठत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन महापौरपदासहित अन्य महत्त्वाच्या समित्यांबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे मुंबईतील सत्ता स्थापन करण्याचा तिढा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत शिंदे गटाला फक्त २९ जागा मिळाल्या आहेत. त्याउलट भाजपने महायुतीत लढताना ८९ नगरसेवक जिंकून आणले. मात्र, भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे महापौर बसवण्यासाठी त्यांना शिंदे गटाची गरज घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदेंनीही भाजपची दुखरी नस ओळखत अडीच वर्षांच्या महापौरपदाचा फॉर्म्युला पुढे केला आहे.
महापौरपदाच्या चर्चेसाठी मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम तसेच शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे सध्या दिल्लीत मुक्काम ठोकून आहेत. त्यातच शिंदे यांनी अचानकपणे मंगळवारी रात्री दिल्लीत जाऊन भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन महापौर आणि इतर समित्यांवर चर्चा केली. दिल्लीतील चर्चेत केवळ मुंबईच्या महापौर पदावरच नव्हे तर इतर महापालिकांमधील सत्तेच्या वाटपावरही खलबते झाल्याची माहिती मिळत आहे. यात ठाणे, कल्याण - डोंबिवली आदी महापालिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.