

मुंबई : मुंबई किनारपट्टीजवळ जप्त करण्यात आलेल्या तीन जहाज मालकांना हायकोर्टाने चांगलाच झटका दिला. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सुरक्षेचा धोका आणि सागरी वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता, तिन्ही जहाजांची सुटका करण्याची मागणी फेटाळून लावत, या जहाजांना गुजरातच्या अलंग शिप यार्डकडे हलवण्याचे आदेश दिले.
समुद्रात बेकायदेशीरपणे इंधन आणि बिटुमेनची वाहतूक केल्याप्रकरणी एमटी अस्फॉल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया ही जहाजे मुंबईच्या किनारपट्टीपासून ११ नॉटिकल मैल अंतरावर ताब्यात घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी या जहाजांनी आपली लोकेशन सिस्टिम बंद ठेवली आणि इराणमधून प्रतिबंधित बिटुमेन आणि इंधनाची चोरटी वाहतूक केल्याच्या आरोपाखाली ही जहाजे जप्त करण्यात आली.