
मुंबई : मानवी दातांना, गंभीर इजा करू शकतील असे धोकादायक शस्त्र मानता येणार नाही, असे म्हणत बॉम्बे उच्च न्यायालयाने एका महिलेच्या तक्रारीवर आधारित एफआयआर रद्द केला, ज्यामध्ये तिने सासरच्या लोकांविरोधात, विशेषतः नणंद तिला चावल्याची तक्रार केली होती.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कणकणवाडी आणि संजय देशमुख यांनी ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तक्रारदार महिलेच्या वैद्यकीय दाखल्यांनुसार फक्त साधा मार लागलेला असून ती केवळ दातांच्या खुणांमुळे झालेली दुखापत आहे.
एप्रिल २०२० मध्ये दाखल झालेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार आणि तिच्या नणंदेत भांडण झाले आणि त्यामध्ये नणंदेने तिला चावले, ज्यामुळे 'धोकादायक शस्त्र' वापरल्याची बाब नोंदवण्यात आली होती. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, "मानवी दात हे धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाहीत."त्यामुळे आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत न्यायालयाने एफआयआर रद्द केला.
कलम ३२४ (धोकादायक शस्त्र वापरून दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा ठरवण्यासाठी त्या साधनामुळे मृत्यू किंवा गंभीर इजा होण्याची शक्यता असावी लागते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील वैद्यकीय दाखल्यांनुसार केवळ साधी दुखापत झाली आहे. कलम ३२४ अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नसताना आरोपींना खटल्याला सामोरे जाण्यास भाग पाडणे म्हणजे कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द केला.