‘सीए’च्या अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल; ‘इंटरमीडिएट’ परीक्षेत मुंबईचीच दिशा गोखरू प्रथम

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम स्तराच्या सीए परीक्षांचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले. अंतिम परीक्षेमध्ये देशात मुंबईतील राजन काबरा याने अव्वल स्थान मिळवले आहे, तर फाऊंडेशन परीक्षेमध्ये गाझियाबादमधील वृंदा अगरवाल आणि इंटरमीडिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू ही अव्वल आली आहे.
‘सीए’च्या अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल; ‘इंटरमीडिएट’ परीक्षेत मुंबईचीच दिशा गोखरू प्रथम
Published on

मुंबई : ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम स्तराच्या सीए परीक्षांचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले. अंतिम परीक्षेमध्ये देशात मुंबईतील राजन काबरा याने अव्वल स्थान मिळवले आहे, तर फाऊंडेशन परीक्षेमध्ये गाझियाबादमधील वृंदा अगरवाल आणि इंटरमीडिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू ही अव्वल आली आहे.

‘आयसीएआय’मार्फत घेण्यात आलेल्या सीए अंतिम, फाऊंडेशन, इंटरमीडिएट या परीक्षा देशातील ५६४ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ग्रुप ‘एक’मधून ६६ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १४ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २२.३८ टक्के आहे.

‘सीए अंतिम’ परीक्षेच्या ग्रुप ‘२’मधून ४६ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १२ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २६.४३ टक्के आहे. तसेच दोन्ही ग्रुपमधून परीक्षा दिलेल्या २९ हजार २८६ पैकी ५ हजार ४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १८.७५ टक्के आहे. या परीक्षेमध्ये मुंबईतील राजन काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवून देशात अव्वल क्रमांक मिळवला. त्याखालोखाल कोलकाताची निशिता बोथ्रा हिने ५०३ गुण मिळवले, तर मुंबईच्या मानव शहा याने ४९३ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

सीए अंतिम परीक्षेपूर्वी ‘सीए इंटरमीडिएट’ परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. ‘आयसीएआय’मार्फत मे २०२५ मध्ये घेतलेल्या या परीक्षेच्या ग्रुप ‘१’मधून ९७ हजार ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १४ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १४.६७ टक्के इतके आहे. तसेच ग्रुप ‘२’मधून ७२ हजार ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १५ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २१.५१ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या ३८ हजार २९ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १३.२२ टक्के इतके आहे. यामध्ये मुंबईतील दिशा गोखरू हिने ६०० पैकी ५१३ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. त्याखालोखाल संदीप देविदान याने ५०३ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. तसेच जयपूरचा यमिश जैन व उदयपूरचा निलय डांगी याने ५०२ गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

‘फाऊंडेशन’ परीक्षेत मुंबईचा यज्ञेश नारकर प्रथम, ठाण्याचा शार्दुल विचारे तिसरा

‘सीए फाऊंडेशन’ परीक्षा देशभरातील ५५१ केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातून ८२ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी दिली. यामध्ये मुलांची संख्या ४३ हजार ३८९ आणि मुलींची संख्या ३९ हजार २७३ इतकी होती. यापैकी १२ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १५.०९ टक्के इतके आहे. फाऊंडेशन परीक्षेमध्ये देशातून गाझियाबादमधील वृंदा अगरवाल ४०० पैकी ३६२ गुण मिळवून अव्वल आली आहे. तसेच मुंबईतील यज्ञेश नारकरने ४४० पैकी ३५९ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठाण्याचा शार्दुल विचारे याने ३५८ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in