राहुल शेवाळे यांचा १०० कोटींचा मानहानी दावा रद्द करा ;उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज

प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचा आदेश देऊन सुनावणी १६ ऑक्टोबरला निश्‍चित केली
राहुल शेवाळे यांचा १०० कोटींचा मानहानी दावा रद्द करा ;उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज

मुंबई : सामना वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द झाल्याने शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेला १०० कोटींचा मानहानी दावा रद्द करा, अशी विनंती करणारा अर्ज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत सुनावणी १६ ऑक्टोबरला निश्‍चित केली.

याप्रकरणी दंडाधिकारी एस. बी. काळे यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला. शेवाळे यांनी दाखल केलेला खटलाच प्रथमदर्शनी चुकीचा असल्याचे अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही नेत्यांना दोषमुक्त करण्याची वकिलांची विनंती

शेवाळे यांनी दै. सामना विरुद्ध आरोप केले आहेत; मात्र, १८६७ च्या पीआरबी कायद्यातील कलम ७ मधील तरतुदी विचारात घेता शेवाळे यांनी केलेल्या आरोपांना दै. सामनाचे संपादक उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत हे जबाबदार नाहीत. कथित आरोपांप्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी कुठलेही पुरावे नाहीत. दोन्ही नेत्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तो फेटाळण्यात यावा आणि उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दोषमुक्त करावे, अशी विनंती अॅड. पिंगळे यांनी दोषमुक्ततेचा अर्ज सादर करताना न्यायालयाला केली. दंडाधिकारी काळे यांनी यांनी अर्जाची दखल घेत प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचा आदेश देऊन सुनावणी १६ ऑक्टोबरला निश्‍चित केली.

logo
marathi.freepressjournal.in