
मुंबई : करचुकवेगिरी प्रकरणात आयकर खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिकाला विशेष सीबीआय न्यायालयाने नुकतेच निर्दोष मुक्त केले. हा निर्णय देतानाच न्यायालयाने सीबीआयवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. सीबीआयचा तपास प्रथमदर्शनी अन्यायकारक आणि निवडक लोकांनाच टार्गेट करणारा असल्याचे निरिक्षण नोंदवले.
रंगनाथ नायक आणि उल्हास सहस्रबुद्धे अशी निर्दोष मुक्तता झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील एक आरोपी मुंबई सेवाकर-१ आयुक्तालयाच्या डेटा विश्लेषण संशोधन केंद्र कक्षात सेवाकर अधीक्षक होता. इन्व्हॉइस बदलून सरकारकडे सेवाकर भरणे टाळण्याचा कट रचल्याचा आरोप दोघांवर होता. मात्र या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपासातील अनेक त्रुटींवर न्यायालयाने बोट ठेवले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार आरोपींची निवड केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आरोपींविरुद्ध गुन्हेगारी साहित्य गोळा करण्यासाठी कोणतेही प्रभावी पाऊल उचलले गेले नाही. यामागील कारण तपास अधिकारी आणि सीबीआयलाच चांगले माहित असेल, अशी टिप्पणी विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी केली आहे. जर आरोपी नायकने खरोखरच सेवाकर चुकवण्यास मदत करणारे कोणतेही कृत्य केले असते, तर तो सेवाकर भरण्यास जबाबदार असता. तथापि, आरोपी सहस्रबुद्धेने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये नायकचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले नाही. यावरून त्यांनी कथित गुन्ह्यात कोणतीही भूमिका बजावलेली नाही आणि त्यांना दुर्भावनापूर्ण हेतूने गोवण्यात आल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवले आहे.
आरोप काय?
सरकारी पक्षाने केलेल्या आरोपानुसार, आरोपी नायकने प्रकाश व्यवस्था भाड्याने देणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या सहस्रबुद्धेला २०१२-१३ आणि २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी बनावट इन्व्हाॅईस तयार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सहस्रबुद्धेने बनावट इन्व्हाॅईस तयार केले आणि नायकने मूळ इन्व्हाॅईस बदलले आणि सेवाकर टाळण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले.