
मुंबई : थाटामाटात पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. मात्र हजारोंच्या संख्येने जमलेल्या या गर्दीचा फायदा काही शर्विलकांनीही घेतला आणि आपल्या ‘हात की सफाई’ची चूणूक दाखवत लहानसहान नव्हे तर तब्बल १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.
५ डिसेंबरला सायंकाळी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. यावेळी अनेक लोकाच्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या, कित्येकांचे मोबाईल फोन्स तर असंख्य लोकांचे पैशांचे पाकीट चोरीला गेले आहेत. यासंबंधी अनेकांनी आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रारींची नोंद केली असल्याचे आझाद मैदान पोलिसांनी सांगितले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेणार होते. या सोहळ्याला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच भाजपचे अनेक मोठे नेते यांसारख्या व्हीव्हीआयपी लोकांची उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमास्थळी ४००० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इतका बंदोबस्त असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्याचे दिसून आले.
आझाद मैदान पोलिसांनी यांबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी असलेल्या मागच्या बाजूच्या २ नंबर प्रवेशद्वाराजवळ एकच गर्दी उसळल. त्याचा फायदा चोरांनी घेतला. त्यांनी लोकांच्या सोनसाखळ्या, मोबाईल्स आणि पैशांच्या पर्स यांची चोरी केली. चोरांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेजची तपासणी केली जात असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.