
विनायक मेटेंच्या कारला अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने मदत पोहोचली. याच कारणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अपघात झाल्यावर आपत्कालीन मदत मिळावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे? मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली.