

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकाने मेल–एक्स्प्रेस व उपनगरी गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४०.५९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल–एक्स्प्रेस गाड्या, वातानुकूलित व गैर-वातानुकूलित उपनगरी गाड्या तसेच स्थानक परिसरातही अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांच्या सुरक्षितते व सोयीसाठी नियमित विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते.
या विशेष मोहिमेत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ९ लाख ६३ हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये या प्रवाशांकडून ४०.५९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वातानुकूलित उपनगरी गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ७१ हजार ०४५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २.२८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर प्रथम श्रेणी डब्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९१ हजार ८३७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.९३ कोटी रुपये दंड घेण्यात आला, तर द्वितीय श्रेणी डब्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६ लाख ९८ हजार २४८ प्रकरणे समोर आली. यामध्ये ३३.६९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये भाडेफरकाची १३,३०१ प्रकरणे समोर आली. त्यांच्याकडून ०.७१ कोटी रुपये दंड घेण्यात आला, तर बुकिंग न केलेल्या सामानामधून ८८ हजार ७१३ प्रकरणे समोर आली. त्यांच्याकडून ०.९८ कोटी रुपये दंड घेण्यात आला.