
मागील काही महिन्यांपासून उपनगरीय रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशिन्स बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीही अवलंबल्या जात आहेत. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मध्य रेल्वेच्या आणखी ५ रेल्वे स्थानकांवर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. हवेच्या मदतीने पाणी तयार करता येणाऱ्या मशिन्स लवकरच रेल्वे स्थानकांवर सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर लवकरच हवेच्या मदतीने पाणी निर्माण करणारी मशीन बसवण्यात येणार आहे. या यंत्राला मेघदूत असे नाव देण्यात आले असून लवकरच या यंत्राच्या मदतीने हवेतून पाणी तयार केले जाणार आहे. या अनोख्या उपकरणातून रेल्वे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येणार आहे. मेघदूत हे एक उपकरण आहे जे संक्षेपण विज्ञान वापरून सभोवतालच्या हवेतून पाणी काढते. या उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात.