
आगामी काळात बिगर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येऊ द्यात. तेव्हा मोदी आणि शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले होते. यावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत विधान करणे म्हणजे ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण. अशी वक्तव्ये केली जात असतील तर आम्हाला निषेध करावा लागेल." अशा कठोर शब्दात त्यांनी टीका केली.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेले विधान म्हणजे विक्षिप्तपणा. राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर जे काही मोदी आणि शहांबद्दल बोलले ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आमच्या नेतृत्त्वावर टीका केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल" असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.