सरन्यायाधीश, मुख्यमंत्री एकाच मंचावर; जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे
सरन्यायाधीश, मुख्यमंत्री एकाच मंचावर; जयंत पाटील यांचे टीकास्त्र

“सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सध्या खरी शिवसेना कुणाची याबाबतच्या वादावर सुनावणी सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

“सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे योग्य नव्हे,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

सरन्यायाधीश उदय लळित यांचा सत्कार समारंभ नुकतच पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.यावर आता विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. “सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणे चुकीचे आहे. मी त्याबाबत माझे मत मांडले. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणे हे चुकीचे आहे. याविषयी राज्यपालांना भेटून टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना कुणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. गेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे. शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे; पण त्याआधीच सुनावणी सुरू व्हावी, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे. जवळपास आठ ते १० दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल हालचाल झालेली नाही. याआधीचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा निवृत्त झाले आणि त्यानंतर ही सुनावणी कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in